
विविध प्रकारच्या रत्नांचा वापर आभुषणे अन् ग्रहपीडा टाळण्यासाठी फार पूर्वीपासूनच केला जात आहे.
धनार्थिनो जनाःसर्वे रमन्तेऽस्मिन्नतीव यत्।
अतो रत्नमिति प्रोक्तं शब्दशास्त्र विशारदैः॥ आयुर्वेदप्रकाश ५-२.
चित्ताकर्षक सौंदर्य अन् मनमोहक गुणधर्म यांमुळे धनवान होऊ इच्छिणाऱ्यांचे मन ज्या वस्तुंमध्ये रमते त्यास रत्न म्हणावे.
किँवा
जातौ जातौ यदुत्कृष्टं तद्रत्नं अभिधियते। रघुवंश १६.
वस्तू वस्तूंमधील जे जे सर्वोत्कृष्ट ते रत्न. अशीही एक व्याख्या केली जाते.
अमूल्यता, वैशिष्ट्यपूर्णता, विविध दिलखेचक रंग अन् वेगळाली आभा, ग्रहपीडा दूर करण्याची क्षमता असणारी खनिजद्रव्ये म्हणजेच रत्ने होत.
नवग्रहांची नऊ रत्ने व इतर ८४ उपरत्ने यांचे सखोल वर्णन अन् अभ्यास म्हणजे आजची फोफावलेली जेमोलॉजी ही विद्याशाखा होय.
ही अनेक रत्ने मात्र आयुर्वेदीय रसशास्त्रात इतर औषधी द्रव्यांप्रमाणेच वापरली जातात. पारदाला (पाऱ्याला) बंधन घालण्यासाठी, वृधत्वनाशक, रोगनाशक, प्रत्यक्ष औषधी कल्पातील एक घटक म्हणून आणि ग्रहपीडानाशक म्हणून रत्नांचा उपयोग अगदी व्यवस्थितपणे आयुर्वेदात लिहून ठेवलेला आहे.
रत्नांची दुर्मिळता, पारदर्शक सौँदर्य, त्यांचे काठिण्य, प्रकाशकिरणांचे परावर्तन, वक्रीभवन यांमुळे पसरणारी आभा, स्फटिकीभवनामुळे दिसणारी विविधरंगी प्रकाशवलये व त्या प्रकाशकिरणांच्या सानिध्यात आल्याने शरीरावर होणारे तथाकथित इष्ट परिणाम इत्यादी कारणांमुळे रत्ने अतिमूल्यवान गटात मोडतात.
आकाशस्थ ग्रहांशी रत्नांचा संबंध जोडून रत्नशास्त्र उदयास आले. नवग्रहांकडून व्यक्तिवर होणारे भलेबुरे परिणाम त्या त्या ग्रहाचे रत्न धारण केल्यास टाळता येतात या समजुतीनुसार देखील रत्नांचे महत्व कैकपटीने वाढले आहे. जेमोलॉजी ही आणखी एक अभ्यासशाखा त्यामुळे निर्माण झाली आहे.
जसे की सूर्यदेवतेचा कोप रोखण्यासाठी माणिक धारण करणे, चंद्रग्रहाचा उपद्रव टाळण्यासाठी मोती किँवा काहीँच्या मते पुष्कराज धारण करणे, मंगळाने व्यत्यय आणू नये म्हणून आपल्याजवळ प्रवाळ बाळगणे, बुधशांतीसाठी पाचू किँवा काहीँच्या मते मोती, गुरुग्रहाची पीडा टळावी म्हणून पुष्कराज किँवा काहीँच्यामते पाचू, शुक्राच्या वक्रदृष्टीसाठी हिरा, शनिच्या साडेसातीवरील उपाय म्हणून नीलरत्न धारण करणे, राहूबाधेवर गोमेद तर केतूपीडेवर वैडुर्य किँवा लसण्या वापरतात. यातील खरे खोटेपणा सिद्ध करणे हा रत्नांइतकाच कठीण भाग असला तरी प्रत्येक व्यक्ती रत्नांकडे आकृष्ट होतच असते.
अशा अनमोल रत्नांबाबत आयुर्वेदोक्त विचार जाणून घेऊ यात...
आयुर्वेदोक्त रत्नशास्त्र...
आयुर्वेदाने नऊ रत्ने व बारा क्षुद्र रत्ने किंवा उप रत्ने वर्णन केलेली आहेत.
१) माणिक्य- याला रुबी किंवा बर्मा रुबी म्हणतात. हे लालारंगी, जड, पाणीदार, स्वच्छ व स्निग्ध दिसणारे रत्न आहे. याचे काठिण्य ९ इतके तर वर्तनांक १.७६ इतका आणि घनत्व सुमारे ४ इतके असते. उष्णतेने हे रत्न निस्तेज बनते किंवा फुटते. आम्लरसामध्ये एक प्रहर स्वेदन केले असता माणिक्य शुध्द होते. ज्या रत्नाचे मारण करावयाचे आहे, त्याचे समप्रमाणात मनःशिळा, हरताळ व गंधक घेऊन लकुच रसात खल करावा त्याचा गोळा तय्तर झाल्यावर त्यात शुध्द केलेल्या रत्नाचे चूर्ण ठेऊन गजपुट द्यावे. याप्रमाणे एकूण ८ गजपुटे दिली असता रत्नाचे भस्म मिळते. माणिक्य भस्म हे दीपन म्हणजे भूक वाढविणारे आणि वृष्य ( शुक्रधातू वृद्धीकर ) आहे.
२) मौक्तिक- याला पर्ल म्हणतात. मोती श्वेत वर्णाचा, स्निग्ध, पाणीदार असा गोलाकार असतो. समुद्रातील शिंपल्यामध्ये तयार होतो. याचे काठिण्य २.५-३.५ , विशिष्ट गुरुत्व २.६७-२.७५ इतके असते.मोती अपारदर्शक असून तो काळा, निळसर किंवा गुलाबी असू शकतो दोलायन्त्रामध्ये जयन्तिपत्राच्या स्वरसामध्ये एक प्रहर स्वेदन केले असता मोती शुध्द होतात. किंवा लिंबू स्वरस व आंबट ताक यामध्ये तीन दिवस रोज द्रव बदलीत मोती ठेवल्यास शुध्द होतात. शुध्द झालेल्या मोत्यांना गोदुग्धामध्ये चांगले घोटून त्यांना तीन लघुपुटे दिली असता शुभ्र भस्म मिळते. हे शीत विर्यात्मक असल्याने पित्त शामक म्हणून विशेषतः वापरले जाते. बृहत वात चिंतामणी व प्रवाळपंचामृत या कल्पांमध्ये मौक्तिक भस्म वापरले जाते.
३) प्रवाळ-पोवळे: याला कोरल म्हणतात. हा पदार्थ रक्तवर्णी, श्वेतवर्णी किंवा धूसर असतो. स्पर्शाला मृदू व दिसण्यास स्निग्ध असतो. दोलायंत्राच्या सहाय्याने जयन्ति स्वरसामध्ये तीन तास स्वेदन केले असता प्रवाळ शुध्द होते. त्याचे भास करण्याच्या तीन पद्धती आहेत. चंद्र पुटी प्रवाळ भस्म हे प्रवालाचे सूक्ष्म चूर्ण गुलाबपाण्याची भावना देऊन चंद्रप्रकाशात सुकाविले असता मिळते. सूर्यपुटी सूर्यप्रकाशात तर अग्निपुटी प्रवाळ भस्म त्याला कुमारी स्वरसाच्या भावना देऊन शराव संपुटात तीन लघु पुटे दिल्यानंतर मिळते. हे भस्म पित्तनाशक व कफ नाशक असल्याने आम्लपित्त, खोकला यांवर उपयुक्त ठरते. प्रवाळपंचामृत, वसन्तकुसुमाकर यांमध्ये प्रवाळ भस्म वापरले जाते.
४) तार्क्ष्य- यालाच पाचू किंवा एमराल्ड म्हणतात. गर्द हिरवा ते काळसर हिरवा किंवा पोपटी अशा रंगत हे रत्न मिळते. याचे काठिण्य ७.५ विशिष्ट गुरुत्व २.७-२.८ आणि वर्तनांक १.५७ इतका असतो. अग्नी किंवा उष्णतेमुळे पाचू निस्तेज बनतो. दोलायंत्राच्या सहाय्याने गोदुग्धामध्ये तीन तास स्वेदन केले असता पाचू शुध्द होतो. माणिक्य भस्माच्या विधीप्रमाणे ८ पुटे दिली असता याचे भस्म मिळते. हे अग्नी दीपक, वृष्य, बलवर्धक, ओजो वर्धक तसेच विषनाशक असते.
५) पुष्कराज- (Yellow Sapphire) हे रत्न पांढरे शुभ्र ते सोनेरी किंवा नारिंगी रंगाचे असते. पारदर्शकता व द्विवार्णीता हे त्याचे गुणधर्म. याचे काठिण्य ८, विशिष्ट गुरुत्व ३.५-३.५३, वर्तनांक १.६१-१.६४ असून उष्णतेमुळे पुष्कराज फिक्कट होते. घर्षणामुळे त्यात विद्युउत लहरी निर्माण होतात. दोलायान्त्रामध्ये कुलीथाचा क्वाथ व कांजी समप्रमाणात घालून पुष्कराज रत्नाचे एक प्रहर पर्यंत स्वेदन केले असता ते शुद्ध होते. माणिक्य रत्नाच्या मारण विधी सारखे त्याचे भस्म करतात. दीपन, पाचन, कफ-वात प्रशमन या गुणधर्मामुळे पुष्कराज भस्म कुष्ठ, छर्दी (उलटी), विषरोग, दाह या व्याधींवर वापरतात. मेध्य (बुद्धीवर्धक) म्हणूनही याचा उपयोग केला जातो.
६) वज्र- (हिरा)- हा रत्नांचा राजा होय. याचा रंग पंधरा शुभ्र किंवा पिवळसर पांढरा, हिरवट किंवा तेलकट असतो. हा पारदर्शक असून अद्विवर्णीत असतो.हिरा सर्वात कठीण असून त्याचे काठिण्य १० इतके असते.हे रत्न चकाकणारे असून त्याचा अस्पर्श मृदू असतो.त्याचे विशिष्ट गुरुत्व ३.५ तर याचा वर्तनांक सर्वाधिक असल्याने हिऱ्यात शिरलेले प्रकाशकिरण आतल्या आत अनेकवेळा वक्रीभूत होऊन बाहेर पडतात. त्यामुळे हिऱ्याला झळाळी, झगमगीत चकाकी प्राप्त होते. हा त्याचा गुणधर्म सर्वांना आकर्षित करणारा आहे. कुलीथाच्या क्वाथामध्ये दोलायंत्राच्या सहाय्याने एक प्रहर स्वेदन केले असता हिरा शुध्द होतो. शुध्द हीरक,शुद्ध हरताल, शुद्ध मनःशीला समभाग एकत्र करून त्यांचे कठीण दगडाच्या खलामध्ये सूक्ष्म चूर्ण करून त्यात तीन वर्षाच्या कपाशीच्या स्वरस घालून मिश्रणाच्या चकत्या कराव्यात.त्या उन्हात वाळवून त्यास यथाविधी महापूटाचा अग्नी चौदा वेळा दिल्यास हिऱ्याचे भस्म मिळते. हे हृद्य, योगवाही, रसायन व वृष्य या गुणधर्माचे असते. राजयक्ष्मा(टीबी), पांडुरोग, उदर(जलोदर),कास इ. व्याधींमध्ये हीरक भस्म वापरतात.
७) नील- ब्ल्यू सफायर म्हणजे नील होय. हे रत्न फिक्कट निळे, निळे, फिक्कट जांभळे किंवा हिरवट निळे या विविध रंगात आढळते. याचे काठिण्य ९, विशिष्ट गुरुत्व ३.९७-४.०१ तर वर्तनांक १.७६ इतका असतो. निळी या वनस्पतीच्या स्वरसामध्ये दोलायंत्राच्या सहाय्याने एक प्रहर स्वेदन केल्यास नील शुद्ध होतो. माणिक रत्नाप्रमाणेच याचे मारण केले जाते. याचे भस्म त्रिदोष नाशक व विष नाशक असून ते बलवर्धक व वृष्य असते. विविध त्वक विकारांमध्ये (त्वचारोग) हे भस्म वापरतात.
८) गोमेद- (Hessonite),सिनोमन किंवा युरेनस किंवा अगेट म्हणजे गोमेद होय. याचा वर्ण मधाप्रमाणे असतो. हे पारदर्शक असून त्यात द्विवर्णीता नसते.याचे काठिण्य ७.२५, विशिष्ट गुरुत्व ३.६५ तर वर्तनांक १.७४ असतो. दोलायंत्राच्या सहाय्याने लिंबाच्या रसात एक प्रहर स्वेदन केल्यास गोमेद शुद्ध होते. माणिक्य रत्नाप्रमाणे याचे मारण करतात. हे भस्म रुचीवर्धक, पाचाकाग्नी वाढविणारे असे असते. याचा उपयोग पांडुरोग, चयरोग यांमध्ये केला जातो.
९) वैडूर्य- यालाच लसण्या, कॅट्स आय किंवा कायमोफोन म्हणतात. हे रत्न पांढरा, पिवळसर, हिरवट, श्यामवर्णी अथवा मधाच्या वर्णापणे विविधरंगी छटांमध्ये आढळते. याच्या पृष्ठभागी असणाऱ्या उभट रेषांमुळे हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसते. याचे काठिण्य ८.५, विशिष्ट गुरुत्व ३.७२ तर याचा वर्तनांक १.७५ इतका असतो. दोलायंत्राच्या सहय्य्ने तीन तास स्वेदन केले असता हे रत्न शुद्ध होते. माणिक रत्नाप्रमाणे याचे मारण केले असता भस्म मिळते. हे पित्तघ्न, शीत, बल्य व चक्षुष्य (नेत्र हितैषी) असते. रक्तपित्त या व्याधी मध्ये या भस्माचा उपयोग केला जातो.
उपरत्ने किंवा क्षुद्र रत्ने बारा प्रकारचे वर्णन केलेले आहेत.
वैक्रांत किंवा फ्ल्युराईटचे भस्म मधुर विपाकी व शीत विर्यात्मक असल्याने बल्य, कान्तीवार्धक, प्रज्ञा वर्धक, दीपक, पाचक व शरीर दार्ढ्यकर, वृष्य, रसायन म्हणून उपयुक्त आहे. ज्वर, कुष्ठ, क्षय, प्रमेह, आरश, गुल्म, उदर इ. व्याधींमध्ये ते वापरले जाते.
सूर्यकांत किंवा स्पायनल रुबी अथवा सन स्टोनचे भस्म उष्ण व रसायन, कफ वातघ्न गुणाचे असून त्यामध्ये मेध्य गुणही आढळतो.
चंद्रकांत किंवा मून स्टोन अथवा अल्बाईट याचे भस्म शीत स्निग्ध, पित्तशामक, रक्तपित्त नाशक असून सर्वांग दाह या लक्षणामध्ये वापरले जाते.
राजावर्त किंवा लॅपीझलुझुली याचे भस्म अग्निदीपक, पाचक, रसायन, कफ-वातघ्न गुणाचे असते. प्रमेह, क्षय,शोष या व्याधींमध्ये ते वापरतात.
पेरोज किंवा टर्कोइज चे भस्म कषाय मधुर गुणात्मक, अग्निदीपक असेच सर गुणात्मक असते.सर्व प्रकारच्या विषाचा परिणाम पेरोज भस्मामुळे नाहीसा होतो असे वर्णन आयुर्वेदात आहे.
स्फटिक किंवा रॉक क्रिस्टल चे भस्म मधुर शीत गुणाचे पित्त व दाह शामक असते.रक्तदोष, ज्वर, दाह, तृष्णा या मध्ये ते वापरतात.व्योमाश्म अथवा जेडाईट आमाशय शोथ, मुत्राश्मरी, प्लीहा या व्याधींमध्ये वापरले जाते.
तृणकांत किंवा अंबर चे भस्म रक्तार्श, रक्तप्रदर, उरःक्षत, सरक्तष्ठीवन या व्याधींमध्ये वापरतात.
पालङ्क (ओनिक्स), रुधिर (कार्नोलीयान), पुत्तिका (पेरीडॉट/ क्रॅसोलाईट/ऑलिव्हाईन), सुगंधिक यांचा वापर इतर रत्नांऐवजी अलंकार म्हणून करावा असे सांगितले आहे. यांचे शोधन, मारण व उपयोग ग्रंथांमधून वर्णन केलेले नाहीत.
या सर्व विवेचनावरून एक लक्षात येईल की आयुर्वेदामध्ये रत्नांचा वापर त्यांचे भस्म करूनच केला जातो. हे आजच्या महागाईच्या युगात इष्ट ठरू शकणार नाही. एखाद्या मौल्यवान रत्नाला भाजून कुटून त्याचे भस्म सेवन करणे प्रत्यक्षात पटणारे नाहीये. तरीही काही ठिकाणी अजूनही असे रत्न भस्म वापरणारे जुने वैद्य आढळतात. प्रवाळ रत्नाचे भस्म मात्र आजही फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आम्लपित्त, उलटी, छर्दी, पित्त प्रकोप यांवर ते फारच उपयुक्त आहे
राशीनुसार रत्ने...
बारा राशींचे स्वामी मानले जाणारे ग्रह व त्यांची पीडा तळावी या हेतूने जोतीष्कारांनी विविध रत्नांचा वापर अंगठी, ब्रेसलेट किंवा पेंडंट म्हणून करावयास सांगितला आहे. सदरहू ग्रह पीडा टाळली जावी यासाठी सूचित केलेल्या रत्नाचा स्पर्श शरीराला होईल अशा रितीने ते परिधान करण्याचे सुचविले जाते. त्यामागे त्या त्या रत्नांच्या पासून येणाऱ्या प्रकाशकिरणांमुळे शक्ती प्राप्त होते अशी धारणा असते. याप्रमाणे मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने त्याची वक्रदृष्टी टाळण्यासाठी प्रवाळ धारण केले जाते. वृषभ व तूळ राशींचा स्वामी शुक्र असल्याने हिरा ल्यावा लागतो. मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी बुध असल्याने पाचुंचे धारण करावे लागते. धनु व मीन राशींचा स्वामी गुरु असल्याने त्यासाठी पुष्कराज वापरावे लागते. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने त्याची साडेसाती भोवू नये म्हणून नील वापरतात. कर्क राशीच्या चंद्रासाठी मोती आणि सिंह राशीच्या सूर्यासाठी माणिक वापरण्याचे सुचविले जाते.
हिरा है सदा के लिए...
हिऱ्याचे गुणवर्णन करावे तितके थोडेच. त्याची चाहत कधीही न संपणारी अशी. हिरा पाहून कोणी हरखलाच नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण. तो कॅरेटमध्ये मोजतात. एक कॅरेट म्हणजे २०० मिलीग्रॅम होय. हे त्याचे वजन असते. हिऱ्याला योग्य कोनात पैलू पडणे हाच खरा जवाहिऱ्याचा कौशल्यपूर्ण भाग असतो. फॅसेटिंग मशीनच्या सहाय्याने हिऱ्याला योग्य कोनात योग्य अंतरावर घासले जाते. यालाच पैलू पडणे म्हणतात. याच पैलूंमुळे हिऱ्यावर पडलेला प्रकाश विस्फारला जातो. हिरा चहूबाजूंनी चमकून उठतो. शिव्य तो पारदर्शक असल्याने आत विविध कोनांनी शिरलेले प्रकाश किरण अपवार्तीत होतांना विविध रंगांसह बाहेर पडतात. ही हिऱ्याची आभा फारच मोहक असते. परंतु हिऱ्याला पर्याय म्हणून क्युबिक झिरकोनिया किंवा मोईसॅनाईटचे खडे सर्रास वापरले जातात. दोहोतील फरक फार अनुभवी जवाहिरेच ओळखू शकतात. मोईसॅनाईट तर त्याच्या अधिक वर्तनांकामुळे हिऱ्यापेक्षा अधिक झळाळी फेकतो. हिरा खूप मौल्यवान असल्याने त्याचा हौसेखातर आभूषण म्हणून होणारा वापर फार प्राचीन आहे. हिऱ्याचे मुल्यत्व ठरविण्यासाठी १० एक्स ची भिंग वापरावी लागते तर काही ठिकाणी म्नेमोरीक डिव्हाईस ग्राहकांना पुरविले जाते. फोर ‘सी’ज म्हणजे कलर, कट, क्लॅरिटी व कॅरेट यांचा तुलनात्मक अभ्यास करून रत्नांची पारख केली जाते किंवा त्याचे मूल्य ठरविले जाते. हिऱ्याच्या बाबतीत त्याचे कट्स फार महत्वाचे असतात. बहुदा त्यावरच त्याची किंमत ठरते. आणि हिरा कितीही महाग झाला तरी तो आपलासा करण्यासाठी कितीही दम मोजण्यास खरे हौशी तयारच असतात, कारण म्हणतातच ना हिरा है सदा के लिए...